पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
मसाल्याचे विविध पदार्थ, पाने, फुले, काड्या यांचा वापर करून अरविंद जोशी यांनी विविध चित्रे साकारली आहेत. हे पदार्थ वापरून खुलवलेले रंग वेगळाच परिणाम करतात.
प्रदर्शनातील सत्तरपैकी पन्नास कलाकृती या नैसर्गिक घटकांपासून घडवलेल्या आहेत. खराटा, केरसुणी, काडीपेटीतील काड्या, गुलमोहर व कडुनिंबाच्या झाडांच्या बारीक काड्या, काथ्या, दोरखंड, शंख, शिंपले, लाकडी मणी आदींचा वापर करून या कलाकृती साकारल्या आहेत.
नोकरीनिमित्त मुंबईत राहिलेले; पण मूळचे रत्नागिरीचे असलेले ७६ वर्षीय अरविंद जोशी कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्यांचे निसर्गावर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे नैसर्गिक रंग, घटक त्यांना भुरळ घालतात. तीस वर्षांपूवी परदेशी पाहुण्यांच्या मागणीवरून त्यांनी भारतीय वारसा दर्शवणारी कलाकृती करून दिली होती. ती नैसर्गिक घटकांपासून तयार केली होती. तिचे खूप कौतुक झाले.
त्यानंतर त्यांना नैसर्गिक घटक, मसाल्याचे पदार्थ यांचा वापर करून कलाकृती साकारण्याचा छंदच जडला. निवृत्तीनंतर त्यांनी अशा कलाकृतीवर घडविण्यावर जास्त भर दिला. तमालपत्र, दालचिनी यांसारखे मसाल्याचे पदार्थ वापरून त्यांनी विविध चित्रे तयार केली आहेत. त्यांचा पोत आणि रंग अत्यंत लक्षवेधक आहेत. त्यांनी केलेली ऑइल पेंटिंग्जही आहेत. नजर खिळवून ठेवतात.
मंगळवार, २६ मार्चपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले आहे.
कार्यक्रमाविषयी :
इंटरफ्यूजन चित्रप्रदर्शन
स्थळ : दर्पण आर्ट गॅलरी, सेनापती बापट मार्ग.
दिवस व वेळ : मंगळवार, २६ मार्चपर्यंत, सकाळी १० ते ७.३० वाजेपर्यंत.